Ad will apear here
Next
... आणि मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाह झाला!
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरील वार्षिकोत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती
श्री देव मार्लेश्वर आणि गिरिजादेवी यांच्या विवाहातील कल्याणविधी सोहळ्याचे दृश्य.

देवरुख :
सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेल्या मारळनगरीत (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) वार्षिकोत्सवासाठी जमलेल्या हजारो भाविकांनी आज (१५ जानेवारी २०१९) मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर साक्षात परमेश्वराचा विवाहसोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. श्री देव मार्लेश्वर आणि कोंडगावची वधू गिरिजादेवी यांचा विवाह दुपारच्या मुहूर्तावर झाला. सनई-चौघड्याच्या सुरात, मंगलाष्टके आणि मंत्रोच्चाराच्या मंगलमय वातावरणात हा सोहळा थाटामाटात पार पडला. 

आंगवली येथील मूळ मठात विवाहापूर्वीचे सर्व विधी झाल्यावर १४ जानेवारी रोजी रात्री विडा भरण्यासह महाप्रसाद, नवस बोलणे, नवस फेडणे असे विधी पार पडले. त्यानंतर प्रथेप्रमाणे श्री देव मार्लेश्वराची मूर्ती, चांदीचा टोप सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आला. गंगामाता आणि मल्लिकार्जुनाची मूर्तीही पालखीत स्थानापन्न करण्यात आली. 

त्याआधी आंबवची दिंडी, वांझोळेची कावड आणि लांज्याच्या दिंडीचे आगमन झाले होते. विवाहसोहळ्याचे यजमान वाडेश्वर देवाची पालखी आदींचे मानकरी आणि भाविकांसह आंगवली मठात सायंकाळी आगमन झाले. १४ जानेवारीला मध्यरात्री १२ वाजता ‘हर हर मार्लेश्वर’ असा जयघोष करीत हा लवाजमा मार्लेश्वर शिखराकडे निघाला. ढोल, ताशे, गुलालाची उधळण करून आणि फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देव मार्लेश्वरची पालखी मार्गस्थ झाली. 

पालखी वाहण्याचा मान प्रथेप्रमाणे भोई समाजाचा होता. सोबत मशालजी म्हणून चर्मकार बंधू, मारळचे सुतार, अब्दागिर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी, न्हावी बंधू याचप्रमाणे मानकरी आंगवलीचे अणेराव बंधू आदींसह हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते. शिखराच्या पायथ्याजवळ असलेल्या पवईच्या पायरीवर हा सारा लवाजमा आणि साखरप्याहून आलेल्या वधू गिरिजादेवीची पालखी उत्तररात्रीनंतर एकत्र आली. त्यानंतर ‘हर हर महादेव’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शिखरावर पोहोचल्यावर तिन्ही पालख्यांचे प्रथेप्रमाणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिन्ही पालख्या नियोजित ठिकाणी वस्तीला गेल्या. 

आज (१५ जानेवारी) पहाटे मुलीचे घर पाहणे, मागणी घालणे, मुलाचे घर पाहणे, पसंती, ठरावनामा, कल्याणविधीची वेळ ठरवणे असे विधी झाले. दुपारी १२ नंतर विवाहासाठी ३६० मानकऱ्यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. दुपारी १२ वाजल्यानंतरच्या मुहूर्तावर श्री देव मार्लेश्वर आणि गिरिजादेवीचे लग्न लावण्यात आले. 

यासाठी हिंदू धर्मातील लिंगायतधर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली होती. करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे होता. रायपाटण, लांजा, मार्लेश्वरचे मानकरी व विश्वस्त यांच्या पौरोहित्याखाली हा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. 

विवाहानंतर उपस्थित भाविकांनी देवाला जानवी अर्पण केली. त्याचप्रमाणे नवीन प्रथेप्रमाणे नवरा-नवरीला आहेर देण्यात आला. या वेळी सौभाग्यवतींनी करंबेळीच्या डोहात फुले, पानाचा विडा, सुपारी, बांगड्या, हळद, पिंजर असे साहित्य असलेली परडी अर्पण केली. सर्व विधी झाल्यावर नवविवाहितांच्या मूर्ती मार्लेश्वराच्या गुहेत ठेवण्यात आल्या. यानंतर महाप्रसाद झाला. 

यात्रोत्सवाच्या ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्थांनी खिचडी प्रसाद, मोफत सरबत, पिण्याचे पाणी आदींचे वाटप, आरोग्य सुविधा असे उपक्रम राबविले. आजच्या यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज तिन्ही पालख्यांचे वास्तव्य मार्लेश्वर शिखरावर राहणार असून, उद्या (१६ जानेवारी) सर्व पालख्या व मानकरी पायथ्याकडे येण्यास निघणार आहेत. 

(मार्लेश्वरबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZQEBW
Similar Posts
थाटात रंगला देवांचा विवाहसोहळा देवरुख (रत्नागिरी) : शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्वरचा विवाह रविवारी (१४ जानेवारी) दुपारी सनई चौघड्यांच्या सुरात आणि मंगलाष्टक, तसेच मंत्रांच्या मंगलमय वातावरणात कोंडगावची श्री देवी गिरिजा हिच्याबरोबर थाटात झाला. या सोहळ्यासाठी असंख्य भाविकांनी सह्याद्रीच्या कपारीत शनिवारपासून गर्दी केली होती
मार्लेश्वरची डोंगरलेणी कोकणातली डोंगरातली, आडबाजूची शिवमंदिरं ही संस्कृतीची, निसर्गाची एक सुंदर देणगी आहे. आजच्या ‘चला भटकू या’च्या भागात करू या अशाच रम्य अशा मार्लेश्वर मंदिराची आणि धबधब्याची सफर...
जुन्नर ते मार्लेश्वर : दिव्यांग व्यक्तीची पदयात्रा देवरुख : जुन्नर ते मार्लेश्‍वर हे शेकडो किलोमीटरचे अंतर सर्वसामान्य धडधाकट माणसाने कापायचे म्हटले, तरी ते अशक्यच आहे; मात्र सर्वसामान्यांना अशक्य वाटणारी ही गोष्ट एका ४९ वर्षीय अपंग शिवभक्ताने शक्य करून दाखवली आहे. खंडू सरजिने असे त्यांचे नाव असून, गेली १४ वर्षे ते अव्याहतपणे जुन्नर ते मार्लेश्वर असा
... आणि त्यांचे चेहरे ‘सौभाग्या’ने उजळले! देवरुख : देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे होऊन गेली, तरी अजूनही काही दुर्गम भागांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरप्याजवळची दख्खन पूर्व धनगरवाडी हा त्यापैकीच एक भाग. नैसर्गिक अडचणींमुळे येथे अजूनही वीजपुरवठा होऊ शकला नव्हता; मात्र अलीकडेच ‘सौभाग्य’ योजनेमुळे आणि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language